कडक पोलिस बंदोबस्तात दहावीच्या परीक्षेला सुरूवात

Foto
औरंगाबाद : राज्यात दहावीच्या परिक्षेला आजपासून प्रारंभ झाला आहे. विभागातील 624 केंद्रावर ही परिक्षा घेण्यात येत असून दोन लाख एक हजार 672 विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत. परिक्षेच्या पार्श्‍वभूमिवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतोने दहावीची परीक्षा आजपासून सुरळीत सुरू झाली. पहिल्या पेपरला विद्यार्थ्यांनी वेळेवर हजेरी लावली. त्यांच्याबरोबर परीक्षा केंद्रावर पालकांनीही हजेरी लावली. यावर्षी दहावी परीक्षेला 2 लाख 1 हजार 572 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. मागील वर्षी विद्यार्थी संख्या अत्यंत कमी होती. यावर्षी दहावी परीक्षेला औरंगाबाद जिल्ह्यातुन 69 हजार 706 विद्यार्थी बसले आहेत. या विद्यार्थ्यांची 222 केंद्रावर परीक्षा घेण्यात येत आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातील 156 केंद्रावर 46 हजार 536 विद्यार्थी तर जालना जिल्यातून 100 परीक्षा केंद्रावर 35 हजार 101 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. तसेच परभणीतुन 31 हजार 956 विद्यार्थ्यांसाठी 93 तर हिंगोली जिल्ह्यातुन 18 हजार 273 विद्यार्थ्यांचे 53 परीक्षा केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देत आहेत. असे एकूण विभागातून 624 परीक्षा केंद्रावर 2 लाख 1 हजार 572 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. यामध्ये मुलींची संख्या 86 हजार 567 तर मुलांची संख्या 1 लाख 15 हजार 5 एवढी आहे. यावर्षी एवढे विद्यार्थी आले कुठून? असा प्रश्न बोर्डासमोर कायम असल्याचे आज दिसून आले.
पंधरा शाळेतील विद्यार्थी परीक्षेला आलेच नाही

औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या पाच जिल्ह्यात दहावीची पेरीक्षेला आजपासून सुरूवात झाली. या परीक्षेला काही शाळांनी एकाही विद्यार्थी परीक्षेला बसविला नाही. विभागातील अशा पंधरा शाळा आढळून आल्या आहेत. या पंधरा शाळांना बोर्डाच्या वतीने ’ विद्यार्थी दाखवा, नाहीतर कारणे दाखवा’ अशा नोटीसाही बजावल्या आहेत. असे असताना या शाळेतील एकही विद्यार्थी परीक्षेला बसलेला नाही. बोर्डाच्या वतीने या शाळेतील विद्यार्थ्यांची कालपर्यंत वाट पाहण्यात आली. परंतु एकही विद्यार्थी परीक्षेला आला नाही. आणि आजही परीक्षा सुरू झाली तरीही त्या पंधरा शाळेतील विद्यार्थी परीक्षेला आलेच नाहीत. या शाळांनी इतरत्र शाळेतून विद्यार्थी परीक्षेला बसविले की काय? असाही प्रश्न आता बोर्डाकडून उपस्थित केला जात आहे. 

भरारी पथकांचे लक्ष
पोलिसांच्या बंदोबस्ताबरोबर भरारी पथक सर्व केंद्रावर लक्ष ठेऊन होते. त्यातच उपद्रवी केंद्रावर सर्वाधिक लक्ष ठेवण्यात आले. कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी बोर्डाकडून विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. हे अभियान शंभर टक्के कॉपीमुक्त राबविण्यासाठी भरारी पथकांनी लक्ष केंद्रित केले. यावेळी अनेक केंद्रावर काही विद्यार्थ्यांनी कॉपी आणल्या होत्या परंतु पोलिसांच्या खाक्या पाहून कॉपी बाहेर फेकण्याचेही प्रकार दिसून आले. तसेच 10 वाजून 30 मिनिटाने परीक्षा केंद्रावर हजर राहणे अनिवार्य केले असल्याने विद्यार्थी आज सकाळी 10 वाजताच पेरीक्षा केंद्रावर हजर राहिले असल्याचे चित्र दिसून आले. यावेळी कडक तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना बूट, चप्पल, बॅग, इलेक्ट्रॉनिक साहित्य बाहेर ठेवण्यात आले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker